vjsthasia-1983-vyapam-scam > app > marathi > core

Test Page

Core include appears below:

व्यापम: भारतातल्या परीक्षा घोटाळ्याशी संबंधित संशयित मृत्यू

2013 मध्ये भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा परीक्षा घोटाळा उघडकीस आला होता. भारताच्या मध्यभागी असणाऱ्या मध्य प्रदेशातल्या व्यावसायिक परीक्षा मंडळाशी अर्थात 'व्यापम'शी हा घोटाळा संबंधित होता. तोतयागिरी, फसवणूक आणि अनियमिततेमुळे राज्यातली परीक्षा व्यवस्था पोखरली गेली होती. या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या हजारो लोकांना अटक करण्यात आली होती.

2013 मध्ये हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी याच्याशी संबंधित असणाऱ्या संशयित व्यक्तींचा एकामागून एक मृत्यू होऊ लागला आणि या घटनेला एक धक्कादायक वळण मिळत गेले. घोटाळ्याशी संबंधित असणाऱ्या संशयितांच्या मृत्यूची कारणं देखील वेगवेगळी होती. हृदयविकाराचा झटका आणि छातीत दुखण्यापासून ते रस्ते अपघात आणि आत्महत्या अशा विविध कारणांमुळे या लोकांचे मृत्यू झाले होते. त्यावेळी मृत पावलेली ही सगळी माणसं अतिशय रहस्यमयी पद्धतीने आणि अकाली मरण पावली होती हे विशेष.

भारताची केंद्रीय तपास संस्था, सीबीआयने व्यापम घोटाळ्याशी संबंधित असंख्य मृत्यूंचा तपास सुरू केला आणि त्यानंतर मरण पावलेले हे लोक नेमके कोण होते? ते नेमके कसे मरण पावले? आणि या सगळ्या मृत्यूंमागे एक ठराविक पॅटर्न होता का? असे प्रश्न निर्माण झाले.

अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा

नम्रता दामोर
वय: १९
मृत्यूचं कारण: संशयास्पद आत्महत्या

इंदूरच्या महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणारी 19 वर्षाची विद्यार्थिनी नम्रता दामोर जानेवारी 2012च्या सुरुवातीला बेपत्ता झाली होती. मात्र दुर्दैवाने 7 जानेवारी 2012 च्या रात्री उज्जैनमध्ये रेल्वे रुळाशेजारी तिचा मृतदेह आढळला. सुरुवातीच्या पोस्टमॉर्टेम अहवालामध्ये असं दिसून येत होतं की श्वासोच्छवास थांबल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.

मात्र तिचा श्वास गुदमरवण्याचा हिंसक प्रयत्न झाल्याचेही या अहवालात उघड झाले होते आणि म्हणूनच तिचा मृत्यू खून म्हणून वर्गीकृत करण्यात आला.

सुरुवातीच्या अहवालामध्ये तिचे ओठ खरचटल्याचे आणि काही दात नसल्याचेही दिसत होते. मात्र तिच्या मृतदेहाचे पुन्हा पोस्टमार्टेम करण्यात आले आणि मग पोलिसांनी खुनाचा आरोप फेटाळून लावत ती आत्महत्याच असल्याचं सांगितलं.

त्यानंतर सुमारे तीन वर्षांनी एका आघाडीच्या वृत्तसंस्थेमध्ये काम करणारे पत्रकार अक्षय सिंग यांनी नम्रताच्या मृत्यूची चौकशी सुरु झाल्यानंतर तिच्या वडिलांची मुलाखत घेतली. मुलाखत सुरु होण्यापूर्वीच अक्षय सिंग खोकायला लागले आणि त्यांच्या तोंडाला फेस आला.

अक्षय सिंग
वय: ३८
मृत्यूचं कारण: माहित नाही

2012 मध्ये नम्रता दामोरच्या रहस्यमयी मृत्यूनंतर अक्षय सिंग मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये राहणाऱ्या मेहताब सिंग दामोर यांच्या घरी पोहोचले होते. नम्रताचे वडील बोलायला तयार झाले आणि दोघे समोरासमोर बसले. त्यावेळी दामोर यांनी नम्रताच्या प्रकरणातली सगळी कागदपत्रं, याचिका, पोलीस आणि न्यायालयाचे अहवाल यांच्या प्रति अक्षय सिंग यांच्या हातात दिल्या. त्यांना चहा देण्यात आला. अक्षय सिंग यांनी चहाचा पहिला घोट घेताच त्यांचा चेहरा गोठला आणि त्यांच्या तोंडाला फेस येऊन ते खाली पडले.

अक्षय सिंग यांना नम्रता दामोरच्या घरी घेऊन जाणारे राहुल कारिया त्याविषयी आठवताना म्हणतात की, "आम्ही त्यांना जमिनीवर आडवे झोपवले, त्यांचे कपडे ढिले केले आणि तोंडावर पाणी शिंपडलं, मी तिथेच त्यांची नाडी तपासली आणि मला कळलं की त्यांचा मृत्यू झाला आहे."

लगेच त्यांना तिथून आधी सरकारी दवाखान्यात आणि मग खाजगी दवाखान्यात नेण्यात आलं पण डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. पोस्टमॉर्टेम अहवालात हृदयविकाराचा झटका आल्याने अक्षय सिंग यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं तसेच मृत्यूच्या वेळी त्यांच्या हृदयाचा आकार मोठा झाल्याचाही उल्लेख त्या अहवालात करण्यात आलेला होता.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशातल्या एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभागप्रमुखांचा मृतदेह नवी दिल्लीतल्या एका हॉटेलात आढळून आला. असे म्हटले जाते की व्यापम घोटाळ्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची एक यादी ते बनवत होते.

डॉ. अरुण शर्मा
वय: ६४
मृत्यूचं कारण: माहित नाही

मध्य प्रदेशच्या विशेष तपास पथकाला व्यापम घोटाळ्याच्या संदर्भातले सुमारे 200 कागपत्रं शर्मा यांनी सादर केली होती. ते जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन म्हणून काम करत होते. परीक्षेतील हेराफेरीत कथितरित्या सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी त्यांनी तयार केली होती. अक्षय सिंग यांच्या मृत्यूनंतर नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असणाऱ्या उप्पल हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. इंडियन मेडिकल असोशिएशनतर्फे केल्या जाणाऱ्या एका चौकशीचा भाग होण्याकरता ते त्रिपुराची राजधानी अगरताळा येथे जात होते.

पोलिसांना त्यांच्या खोलीत जवळपास संपत आलेली एक दारूची बाटली सापडली. त्या रात्री शर्मा यांनी भरपूर दारू पिऊन उलट्या केल्याचं दिसत होतं आणि त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याची माहिती तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी दिली होती.

योगायोग असा होता की अत्यंत गूढ परिस्थितीत मृत पावलेले शर्मा हे मेडिकल कॉलेजचे दुसरे डीन होते. त्याआधी एका वर्षापूर्वी जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आणखीन एका डीनने त्यांच्या घरामागे असणाऱ्या बागेत आत्मदहन केलं होतं.

डॉ. डीके साकळे
वय: -
मृत्यूचे कारण: संशयित आत्महत्या

जबलपूर मेडिकल कॉलेजचे तत्कालीन डीन डॉ डीके हे व्यापम घोटाळ्याच्या महाविद्यालयांतर्गत होणाऱ्या चौकशीचे प्रभारी होते. त्यादिवशी सकाळी 8.45 च्या सुमारास ते त्यांच्या घरातून जळत बाहेर पडताना दिसले त्यावेळी त्यांची बायको सकाळी फिरण्यासाठी बाहेर गेलेली होती.

ही एक आत्महत्या होती आणि याबाबत काहीही संशयास्पद आढळून आलं नसल्याचा खुलासा पोलिसांनी त्यावेळी केला होता. मात्र या घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांनी ही केवळ आत्महत्या नसल्याचे सांगत त्यांच्या मृत्यूची केंद्रीय चौकशी करण्याची मागणी त्यावेळी केली होती.

नरेंद्र राजपूत
वय: ३५
मृत्यूचं कारण: माहित नाही

झाशीच्या एका महाविद्यालयातून बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (बीएएमएस) चे पदवीधर असणारे नरेंद्र राजपूत त्यांचा अकाली मृत्यू होण्याच्या सहा महिन्यांपूर्वीच मूळ गावी परतले होते आणि आणि त्यांनी हरपालपूरमध्ये एक क्लिनिक उघडले होते.

13 एप्रिल 2014 रोजी नरेंद्र शेतात काम करत असताना त्यांनी त्यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार केली आणि ते घरी परतले, पण दारातच कोसळले. मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात पोस्टमार्टेम अहवाल अयशस्वी ठरले होते तरीही त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारच्या शेतकरी विमा योजनेंतर्गत विमा मिळवण्यासाठी तक्रार दाखल केली होती. मात्र अहवाल अस्पष्ट असल्याने त्यांचा दावा यशस्वी होऊ शकला नाही.

नरेंद्र राजपूत यांच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार त्यांच्या मृत्यूनंतर कित्येक दिवसांनी पोलीस घरी आले आणि मग व्यापम घोटाळ्यात नरेंद्र राजपूत हे एक दलाल म्हणून गुंतले होते अशी माहिती समोर आली.

2007 ते 2015 दरम्यान व्यापम घोटाळ्याशी संबंधित असणाऱ्या एकूण 32 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला होता. मात्र प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार बातम्यांनुसार तब्बल 40 लोकांचा मृत्यू या घोटाळ्यात झालेला होता. विशेष सुरक्षा पथक आणि सीबीआयने आरोपपत्रामध्ये नोंदवलेली नावं आणि प्रसारमाध्यमांनी नोंदवलेल्या मृत्यूचा आम्ही एक आढावा घेतला आहे.

व्यापम घोटाळ्याशी संबंधित असणारे आणखीन काही मृत्यू

  • शैलेश यादव
  • विकास पांडे
  • आनंद सिंग यादव
  • अंशुल सचान
  • ग्यानसिंग यादव
  • तरुण माछर
  • डॉ राजेंद्र आर्य
  • प्रमोद शर्मा (रिंकू)
  • देवेंद्र नागर
  • बंती सिकरवार
  • दिनेश जाटव
  • नरेंद्रसिंग तोमर
  • अरविंद शाक्य
  • आशुतोष तिवारी
  • कुलदीप मारावी
  • विकास भरत सिंग
  • डॉ रामेंद्र सिंह भदोरिया
  • ललितकुमार गोलरिया
  • विजय छोटेलाल सिंग
  • अमित सागर
  • प्रवीण यादव

परीक्षांमध्ये कसा घोटाळा करण्यात आला?

व्यापम परीक्षांमध्ये दलाल, विद्यार्थी, महाविद्यालयीन कर्मचारी, बाहेरील व्यक्ती, तसेच प्रभावशाली डॉक्टर आणि राजकारण्यांसह विविध व्यक्तींनी फसवणूक आणि अनियमितता केल्याचे आढळून आले.

तोतयागिरी

उमेदवाराच्या ऐवजी बोगस उमेदवार परीक्षा देत होते. अधिकृत उमेदवारांकडून पैसे उकळून त्यांच्याऐवजी बोगस उमेदवारांची व्यवस्था करण्याचं काम दलालांकडून केलं जात होतं.

विद्यार्थ्यांच्या वतीने तोतयागिरी करणाऱ्यांचे अनुसरण केले

अशा पद्धतीने परीक्षा घेण्यासाठीची यंत्रणा अनेक परीक्षा केंद्रांवर बनवण्यात आलेली होती. दलाल, बोगस उमेदवार, केंद्रसंचालक आणि यासाठी व्यवस्था बनवण्यात आलेली परीक्षा केंद्र या सगळ्यांचं एक पद्धतशीर जाळं हा घोटाळा घडवून आणण्यासाठी विणलं गेलं होतं. या परीक्षेची पातळी कमी करण्यासाठी अनेकांच्या संगनमताने हा घोटाळा घडवून आणण्यात आला.

इंजिन-बोगी प्रणाली

रोल नंबर्सची फेरफार ही एक सामान्य गोष्ट होती, ज्यामध्ये फसवणूक करण्यासाठी उमेदवारांच्या रोल नंबरमध्ये हेराफेरी केली जात होती. परीक्षेत फसवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे म्हणून इंजिन बोगी प्रणालीचा वापर करण्यात आला होता जिथे इंजिन म्हणजेच तोतया उमेदवाराला बोगी म्हणजे खऱ्या उमेदवाराच्या आसपास बसवण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीनें जवळ जवळ बसल्याने परीक्षेत उमेदवाराला उत्तरं सांगण्यात आणि संवाद साधण्यात मदत झाली आणि त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्याला अधिकचे गुण मिळवता आले.

इंजिन बोगी प्रणालीची प्रतिमा

गुणपत्रिकेत छेडछाड

परीक्षा प्रक्रियेतील दलालांच्या सहभागाचा फायदा घेऊन उमेदवार अनेकदा जाणूनबुजून त्यांच्या उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवत असत.

मध्यस्थ मार्कशीटशी छेडछाड करतात

जेणेकरून हे दलाल त्यांच्याकडे असणाऱ्या संगणकांचा वापर करून उत्तरपत्रिकेमध्ये योग्य ती उत्तरं भरू शकतील आणि पैसे देणाऱ्या परीक्षार्थीला उत्तीर्ण करू शकतील.

शिवाय, या व्यतिरिक्त, असे उमेदवार होते ज्यांनी केवळ या परीक्षांमध्ये पात्र होण्यासाठी आणि भरती प्रक्रियेला बायपास करण्यासाठी पैसे भरले होते. याव्यतिरिक्त, राजकारणी आणि डॉक्टरांसारखे प्रभावशाली लोक होते जे थेट भरती प्रक्रियेत गुंतलेले नसतानाही, आर्थिक लाभ मिळविण्यासाठी या घोटाळ्याचा फायदा घेत होते.

व्यापममधील फसवणूक आणि अनियमिततेशी संबंधित आणि गूढ परिस्थितीत मरण पावलेल्या बहुतेक संशयितांवर दलाली केल्याचेच आरोप करण्यात आले.

गूढ पद्धतीने झालेल्या मृत्यूचे आकडेही वेगवेगळे असल्याने संशय निर्माण झाला आणि या प्रकरणांची सखोल आणि निःपक्षपाती तपासणी करण्याची गरज अधिक तीव्र झाली. सीबीआयच्या सहभागाचा उद्देश या मृत्यूचा सखोल तपास करणे हा होता. यासोबतच या मृत्यूचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचाही तपास सीबीआय करणार होतं.

अशा असंख्य मृत्यूंच्या तपासात एक मोठा अडथळा होता कारण त्यांच्याकडे पुरेसे आणि ठोस पुरावे नव्हते आणि त्यामुळे अखेर असे अनेक तपास बंद करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या नम्रता दामोर यांचा मृतदेह उज्जैनमधील रेल्वे रुळांजवळ गूढ परिस्थितीत सापडला होता मात्र त्यांचा खटला आता सीबीआयने तिसऱ्यांदा विशेष न्यायालयात बंद करण्यासाठी दाखल केला आहे. शेवटी त्यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले. नम्रताचे वडील मेहताब दामोर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, ते तपासावर समाधानी नाहीत.

...there we go.